भक्ताने देवाजवळ काही मागितले आणि देवाने ते त्याला दिले म्हणजे मग भक्त देवाविषयी अत्यंत भावूक होतो. महाराष्ट्रातील काही देवीच्या मंदिरात देवीपुढे अनेक भाविक स्त्री-पुरुष स्वत:ला उलटे टांगून घेवून नवस फेडतात. या प्रकारच्या नवस फेडण्याच्या अनेक तर्हा आगळ्यावेगळ्या असतात. भक्ती प्रकट करण्याची ती प्रथा असते.
बालाजीला तिरुपती येथे गेल्यावर तेथे आपल्या डोक्यावरील सर्वकेस भक्तिभावे अर्पण करतात. शिवबाने तर बालपणीच शिवनेरीला रोहीदेश्वरापुढे शिवास अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. देवसुद्धा भक्तांकडून काही तरी घेतल्याशिवाय भक्ताला काहीही देत नाही. संत नामदेव म्हणतात -
"घ्यावे तेव्हा द्यावे/ ऐसा असशी उदार//
काय म्हणुनी धरू देवा/ तुझे कृपणाचे द्वार//"
देवीचे देवूळ खूप डोंगरावर असेल तर प्रत्येक पायरीवर हळदीकुंकू वाहून, फुलवात लावून देविपर्यंत पोहोचण्याचा नवस फेडणाऱ्या भाविक स्त्रिया पाहून कुणीही अचंबित होईल. प्रेम भक्तीचे अनेक प्रकार या नवसात पहावयास मिळतात.
अनेक भाविक तरुण कित्येक मैलावरून तीर्थाच्या कावडी भरून शेकडो तरुण भक्तिपूर्वक प्रवास करून नवस फेडताना दिसतात. त्यांचा तो प्रवास भक्तीफेरी व दिंडीचा प्रकार असतो. खंडेरायाला नवस केला जातो. त्या नैवेद्यात रोडगा हा पदार्थ अर्पण करतात.'रोडगा वाहीन तुला' असे संतवचन आहे. शेकडो मैलावरील आपल्या दैवताच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांप्रमाणे काही नवस फेडणारे भाविक लोटांगण घालीत तेथपर्यंत पोहोचून देवास भेटतात. हाही एक नवसाचा प्रकार आहे.
संसार तापाने जीव देवाकडे आशेने जातो. आपले दु:ख, दैन्य, व्याधी दूर करणारा एक ईश्वरच आहे. तो संकट दूर करून आनंद देणारा आहे अशी भावना भक्तांच्या मनी निर्माण होते. मग तो देवाकडे धाव घेतो. दु:ख व्याप्त मनस्थितीत तो देवी-देवतांकडे साकडे घालतो. त्याचे हाती नारळ असते ते तो देवाला अर्पण करतो. देवापुढे फोडतो. देवाला विनवणी करून त्याच्यापुथे पैसेसुद्धा टाकतो. देवाकडे मागितलेले जर पूर्ण झाले तर तो नवस करतो.
देवी देवतास अनेक प्रकारे नवस केले जातात. अधिक नवस देविमातेस, खंडोबास केले जातात. नवरात्रात देविमातेस व वान्गेसाठीच्या दिवशी खंडोबा-माल्हारीस केले जातात.
कोंबड-बोकड्याचा बळी नैवेद्य कबूल करून लाखो नवस फेडले जातात. हिंदू तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष करून संतांनी जे करू नका सांगितले तेच आचरण्यात अविचारी भोळ्या भाविकांच्या हट्टापुढे देवही हतबल झाले असतील. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील भेद अत्यंत सूक्ष्म आहे. संतांच्या विचारांचे आकलन झाल्याशिवाय खरी भक्ती कशी करावी हे समजत नाही तोपर्यंत नवस करावेत व फेडावे. म्हणजे देवाचे अस्तित्व .मान्य करून माणूस नास्तिक तरी होणार नाही.
नामदेव सदावर्ते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा