ब्लॉग संग्रहण

मंगळवार, ९ मार्च, २०१०

'स्त्री - शक्ती' देशाची भाग्यविधाती ठरो!



'वाटमारीच्या पापात' मी सहभागी होणार नाही असे स्पष्ट सांगणारी 'वाल्याची' बायको जर राजकारणात आली, तरच देशाचे राजकारण सुधारेल. जिजामातेच्या संस्काराने प्रभावित झालेल्या स्त्रिया, 'सावित्रीचा वसा' घेवून राजकारणात आल्या तर देशाचे भले होईल. दारूबंदीला विरोध करणाऱ्या स्त्रिया महाराष्ट्राचे भाग्य घडवतील. महिलांनी 'स्व-बळावरच राजकारणात कार्य करावे.
आजपर्यंत अनेक क्षेत्रात 'निष्कलंकपणे ' कर्तव्य बजावणाऱ्या स्त्रिया पाहिल्यावर, या देशाचे राजकीय प्रदूषण दूर करण्याचे सामर्थ्य स्त्रियांत आहे हे मान्य करावेच लागेल. राजकारणात महिला 'स्व' तेजाने चमकू लागल्या तर महाराष्ट्राचे राजकीय शुद्धीकरण होणे शक्य आहे.
महिला विधेयकाला विरोध होणे साहजिकच आहे. वैयक्तिक स्वार्थाच्या आड येणारे काटे दूर करणे हा मानवी स्वभाव आहे. कोणत्याही निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना राजकीय पक्षाने महिलांना प्राधान्य दिले तर तो पक्ष सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. असा प्रयोग व्हावा.
महिलांकडून महिलांचे प्रबोधन घडावे. महिला शक्ती एकवटताच या देशात चमत्कार घडतील, फक्त स्वार्थी राजकीय पक्षांचा अभिनिवेश दूर ठेवून जर महिला राजकारण करतील तर देशात नवा इतिहास घडू शकेल. 'राजकीय नरकासुर' सत्य-भामाच ठार करू शकेल!
देशाच्या साऱ्या विधानसभा आणि देशाची संसद केवळ 'कटपुतली बाहुल्यांचा' खेळ ठरणार नाही अशी भारतमातेच्या चरणी प्रार्थना!
नामदेव सदावर्ते (नाशिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा