या मंगलमुर्ती गणराया ! या ! महाराष्ट्रातील भोळ्या भाविक भक्तांसाठी आपण दरवर्षी कैलासाहून पृथ्वीवर येत असता तसेच या वर्षीही आपण आलात ! महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील करोडो भक्त आपले आनंदाने भक्ती भावाने जल्लोषाने स्वागत करीत आहेत.
पण हे देवा गणराया! काय शोधीत आहात आपण? समाजप्रबोधन करणाऱ्या व्यासंगी विद्वानांची व्याख्यानमाला, परिसंवाद, कीर्तने- पारायणे, प्रवचने आदी धार्मिक कार्यक्रम आपणास पहावयास मिळतील. या आशेने आपली सूक्ष्म व शोधक नजर भिरभिरताना दिसते. शंभर वर्षांपूर्वीची ती तुमच्या उत्सवाची पवित्र परंपरा नष्ट झाली. याचे दु:ख तुम्हाला होत असते. तरीही तुम्ही दरवर्षी येत ते कशासाठी? भक्तांची होत असलेली अधोगती केवळ अज्ञानामुळे होताना दिसते.
आपण तर बुद्धीदाते आहात. आपल्या भक्तांना बुद्धीसंपन्न होण्याची प्रेरणा द्या! पूर्वीप्रमाणेच तरुणपिढी स्वाभिमानी , कष्टाळू, निर्भय तेजस्वी, विचारी धनसंपन्न आणि धार्मिक असावी असे आपणास वाटते ना ! पण पहा तुमच्या मिरवणुकीत 'डीजे'च्या बेसूर कर्कश आवाजात धुंद-मद्यधुंद होऊन नाचणारी तरुण मुले-मुली, राजकारण्यांनी दिलेल्या वर्गणीच्या प्रचंड पैशांनी बेफाम झालेली, हरी तरुणपिढी पाहून अपार चिंताक्रांत नजरेने पाहता ना ! शंभर वर्षात झालेल्या या अधोगतीमुळे तुम्हाला क्लेश होतांना दिसतात.
देवा, तू विघ्नहर आहेस. येथे येऊन भक्तांची दुर्दशा तू पाहतो आहेस ना ! अतिरेक्यांच्या दहशतवादी कारवाया , प्रचंड महागाई, निसर्गाचा कोप, शिवाय सार्वजनिक क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झालेली जनता पाहून हे गणराया तुला खूप दु:ख होत आहे ना !
गणराया तुम्ही आमच्या भेटीसाठी येता आणि आम्ही रस्त्यांवर अडथळ्याचा विचार न करता मंडप उभारतो, वीज चोरी करून रात्री रोषणाई करतो. उत्सवाचे उत्पन्न वाढावे म्हणून रात्री 'जुगार' खेळतो. नगरसेवक, राजकारणी नेते, यांच्याकडून गुप्तदान आणतो. हे गुणराया तुला न आवडणारे सर्व गाणे रेकॉर्डवर लावतो. तुमहाला जे आवडणार नाही ते तुमच्यासमोर आम्ही करतो हे सारे गणराया तुम्ही निर्विकारपणे पाहता. येथे येण्यापेक्षा येथून परत जातांना तुम्ही अधिक आनंदात असता.
हे गणराया लोकशाहीची विटंबना सर्वत्र आढळते. ते ज्ञानसंपन्न कार्यकर्ते, कलाकार, व्याख्याते पुन्हा उत्सवात दिसतील अशी बुद्धी दे. केवळ उत्सवाच्या नावावर प्रचंड संपत्ती गोळा करून, अनाठायी खर्च व अपहार करणारे गुंडप्रवृत्तीचे लोकच तुला सर्वत्र आढळतील. आरतीनंतर नेत्याचाच जयजयकार होतो. हे गणराया, असुरक्षित नेते, पूरग्रस्त, व्यसनग्रस्त व भयभीत झालेली जनता पाहून तुला होणारे दु:ख कोण समजून घेईल? ती पहा.....वैयक्तिक स्वार्थासाठी लाचारी प्रकट करीत सत्ताधाऱ्यापुढे हात जोडून वाकून टोळी, दारू, गर्द, अफू, गांजा यासारख्या व्यसनांच्या आहारी जावून मृत्युच्या दारात उभी असलेली बेरोजगार तरुणांची गर्दी!
तत्वनिष्ठ, कर्तव्यप्रेम सोडून सत्तेपुढे मुजरा करणारे लाचार सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस सर्वत्र दिसतात आणि ते पहा....हे गणराया तुझ्या उत्सवात आपली राजकीय पोळी भाजू पाहणारे राजकारणी!! महागाई विसरून भक्त राजकीय नेत्याला मान देतो.
हे देवा, आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा असो कि मराठी साहित्यसंमेलने दोन्हींकडे पैशांचा अपहार उघड झाल्याची वार्ता तुम्हाला ऐकावयास मिळाली ना? शिक्षण क्षेत्र तर भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे. शाळेत बालकांना पोषण आहार देण्यासाठी प्रचंड अनुदान दिले जाते, त्यातही 'भ्रष्टाचाराची खिचडी'शिजत आहे ना ?हे गणराया, तू सर्वज्ञानी आहेस, सूक्ष्म डोळ्यांनी तू हे सर्व पहाशीलच पण लोक आम्हाला निगेटिव माइन्डचे म्हणतील कारण आता भ्रष्टाचारात सामील होणे यालाच 'सकारात्मक विचारसरणी' म्हणतात. देवा तूच बुद्धी व सामर्थ्य देशील तर भविष्यात परिवर्तन घडेल. 'पसायदान' प्रत्यक्ष साकारेल! अन्यथा.....सक्तीची वर्गणी व भ्रष्टाचाऱ्यानी दिलेल्या गुप्तदानाच्या जोरावर चालणारे तुझे 'उत्सव' केवळ मौजमजा व मद्यधुंद जेवनावल्या ठरतील ! मराठी अस्मिता जपण्यासाठी भाषाभिमान निर्माण होणार नाही हे 'मराठीमनाला' कळू दे. गणराया, आला आहात तर देश, महाराष्ट्र व मराठी संस्कृती वाचविण्यासाठी भक्तांना बळ द्या.
नामदेव सदावर्ते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा